पुणे : ‘युनायटेड नेशन्सने सर्वांसमोर उद्दिष्ट म्हणून ठेवलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स् जगासाठी हितकारक आहेत, ते साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे,’ असे प्रतिपादन विकसनविषयक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर यांनी केले.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर यांच्या हस्ते व डॉ. कुलजित उप्पल यांच्या उपस्थितीत १८ जानेवारी २०१९ या परिषदेचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.
या वेळी बोलताना डॉ. इनामदार म्हणाले, ‘महिला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने भारत आंतरराष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात मागे आहे; मात्र स्वातंत्र्योत्तर काळात आपण प्रगती केली असून, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आली आहे.’
या वेळी आबेदा इनामदार, मुझफ्फर शेख, इरफान शेख, डॉ. एम. जी. मुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आफताब आलम यांनी आभार मानले. केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे परिषदेच्या समारोपप्रसंगी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहा विद्यापीठांतून १२० तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. यात ६५ शोधनिबंध सादर करण्यात आले.